Thursday, 16 November 2017

हिडन एव्हिडन्स!

धान्य निवडण्यात सुद्धा काय अनामिक मजाय...!!! मला आठवतं, शाळेत असताना सुट्टीत आजीकडे गावी गेलं कि हा कार्यक्रम ठरलेला असायचा.मग एक दिवस सकाळी ऊन्हं वर आली कि घराच्या गच्चीवर आज्जीची जुनी साडी अंथरायची. चार टोकाला चार दगड ठेवायचे. तसले मोठाले दगड शोधण्यासाठी मग निम्मा परीसर पालथा घालायचा. आणि नाहीच सापडले तर मध्यम आकाराचे तिन-चार दगड प्रत्येक कोप-यात ठेवायचे. एकजुटीनं काम करणं म्हणजे काय हे आज्जीला त्या दगडांनी शिकवलं असावं!  दोन मावश्या आणि मी अशी आमची टिम. आज्जी टिम लिडर. मग जे काही धान्य असेल त्याची भरलेली पोती गच्चीवर न्यायची अन् अंथरलेल्या साडीवर बिन्धास ओतुन द्यायची. मग हाताने सावरत एक एक दाणा वेगळा करायचा अन् त्या साडीवर प्रत्येकाला स्वतंत्र जागा द्यायची. नो ओव्हरलॅपींग!!
     क्वचितच कधी धान्य खायला माकडं यायची. नाहीतर कबुतर, चिमण्या, साळुंकी असे रोजचे पक्षी आहेतच. इतरवेळी राखण करायला मला फार भारी वाटायचं. माकडं आली कि मात्र धांदल उडायची.
    दुपारची जेवण आटपली झोप झाली कि सगळं धान्य खाली आणायचं. मग मी दोन मावश्या आणि आज्जी मोठी ताटं घेऊन धान्य निवडायला बसायचो. धान्यातली घाण, किडे वेचुन वेचुन पाण्यात टाकायच्या. खिडकीतुन येणारं हलकं ऊन आणि जोरात वाहणारा वारा यांचं कोंबीनेशन म्हणजे काहीतरीच भन्नाट असायचं. या निवडा-निवडीत कित्येक गप्पा व्हायच्या, गाणी व्हायची, जोक्स व्हायचे. मधेच आजोबा फक्कड चहा बनवायचे मग त्याच्या जोडीला काहितरी तळण करुन कामाचा कंटाळा घालवायचा. चहा प्यावत नसेल तर कधीतरी आईसक्रिम पार्टी व्हायची.... तेव्हा कंटाळवाणं, नको वाटणारं ते काम आज रात्री एकच्या ठोक्याला माझ्या मनात इतक्या आठवणी क्रियेट करेल अस कधीच वाटलं नव्हतं!
    मग आज्जी सगळं धान्य परत परत पाखडायची अन् मग पुन्हा सारं धान्य कोठीत भरुन ठेवायचं आणि अंधार पडायच्या आत घर झाडुन घ्यायचं. झालेल्या अंधाराला आणि रात्रीला आम्ही काम केल्याचा कोणताच पुरावा आज्जी मागे ठेवायची नाही. बसुन बसुन दुखणारी पाठ हाच काय तो हिडन एव्हिडन्स.... ©Renuka

एका नास्तिकाचे पत्र

प्रिय आस्तिक माणसा, (असहिष्णूवाला)
       गेल्या खूप दिवसांपासून मी तत्त्वज्ञान शिकतेय आणि माझ्या नास्तिकतेचा, तू काढून घेऊ पाहणारा, पाया अधिकाधिक भक्कम होऊन मला परत मिळतोय.
       तब्बल  १६ शतक  धर्माच्या सांगण्यावरून डार्क एजमधे गाढ झोपलेल्या जगाला देकार्त, गॅलिलिओ गदागदा हलवतात. रेनेसान्स नावाचं बादलीभर पाणी जगाच्या तोंडावर ओततात. तेव्हा कुठे जग थोडफार जाग आल्यासारखं दाखवतं. तिथे पर्शिया मधे कुठेतरी कोपरनिकस नावाचा शास्रज्ञ जन्माला येतो आणि सगळ्या धर्मांच्या, सगळ्या लोकांच्या, सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन 'ब्रह्मांडाच्या मध्यभागी पृथ्वी नाही तर सूर्य आहे' हे सत्य सांगतो. जगाला 'इन्लाइटन्ड' करतो! आणि जग या 'बंडखोरी' क्रांतिकारकांना विरोध करत...?!
       जगाचा हा सगळा प्रवास मला खूप आपलासा वाटतो. माणसाच्या अस्तित्वाच्या पहिल्या पाऊलखुणा सापडतात त्या काळात जगाला विश्वउत्पत्तीशास्त्र (Cosmology) महत्वाचं वाटतं होतं. मग सॉक्रेटिस आला, प्लेटो, अॅरिस्टॉटल आले. नीती-अनीती च्या संकल्पना रूढ झाल्या. आणि धर्म आला. तेव्हा जगाने प्रश्न विचारणं बंद केलं आणि प्रबोधन काळातील  क्रांतिकारी विचार प्रकाश दाखवत नाहीत तोवर, म्हणजे जवळपास १६०० वर्ष, जग अंधा-या युगात बुडून राहीलं. जन्माला आले, स्वतःच्या अस्तित्वाच्या खूणा समजून घेऊ लागले तेव्हा मला सुद्धा कॉस्मॉलॉजीत इन्टरेस्ट होता. इतर लहान मूलं प्रश्न विचारतात तसे पृथ्वीबद्दल, चंद्र, सूर्य, तारे, आकाश, हवा, पाणी, अग्नी अगदी सगळ्यांबद्दल मी सुद्धा कुतूहल दाखवलं. पण हळूहळू घरच्यांनी, शेजार-पाजा-यांनी , अगदी शाळेनेसुद्धा 'देवासारखी गप्प बैस' फॉर्म्युला वापरून मला गप्प केलं आणि जवळपास १६ वर्षांनंतर जे रिव्होल्यूशन कोपरनिकसने खगोलशास्त्रात केलं तेच रिव्होल्यूशन मी माझ्या आयुष्यात केलं. कोपरनिकस ने ब्रम्हांडाचा केंद्रबिंदू बदलला. मी माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलला; देव, धर्म यांच्यावरून माझ्यातल्या मला माहित नसलेल्या मी शोधण्यात हलवला. मी स्वतःच अस्तित्व शोधण्यासाठी देवाचं आणि धर्माचं अस्तित्व नाकारलं! अस्तिक माणसा, तूला हे सारं स्व-प्रेम किंवा पश्चिमेकडून आलेला selfishness वाटतो. पण मला फक्त स्वतःला एक्सप्लोर करताना येणारा धर्माचा आणि देवाचा अडथळा दूर करायचा होता.
     मला माहितीये, तुझ्यासाठी देव, धर्म  हे स्वतः ला एक्सप्लोर करण्यातले अडथळे असत नाहीत. उलट ते तुझे तुझ्या ध्येयापर्यंत नेणारे मार्ग असतात. कारण तू त्यांच्यावर श्रद्धा ठेवतोस, विश्वास ठेवतोस. तुझी श्रद्धा अंधश्रद्धेत कधी बदलते ते तूझं तूलाही कळत नाही ते जाऊ दे, पण मुळात तूझ्याकडे तो श्रद्धेचा भाव आहे. सुदैवाने म्हण कि दुर्दैवाने हा भाव माझ्यात नाहीये. हा भाव मला खूप खूप आवडतो. 'विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यायचाय, जीवन-मरणाच्या रहाटगाड्यातून मूक्त व्हायचं नाहीये' असं म्हणणारे तुकाराम मला प्रचंड भावतात. मला तुकारामांचा, त्यांच्या आणि तुझ्या श्रद्धेचा मनापासून आदर वाटतो. खूप खूप वाटतो. पण मला तुकारामांविषयी किंवा त्यांच्या विठ्ठलाविषयी श्रद्धा नाही वाटत. मग कशाला उगाच जुल्माचा रामराम?! मला नाही वाटत कि माझा देव ज्याला आपण विठ्ठल/गणपती/विष्णू/सरस्वती/दुर्गा/काली असं म्हणतो त्या कुठल्याही दगडात किंवा मूर्तीत असेल. मला माझा देव चौकट-बद्ध नको वाटतो. स्पिनोझाचं 'Every determination is negation' हे वाक्य मला माझ्या देवाविषयी सुद्धा खरं वाटू लागतं. मी माझा देव काय आहे किंवा काय नाहीये किंवा काय असायला पाहिजे किंवा काय नसायला पाहिजे किंवा काय असू शकतो किंवा काय नसू शकतो असं काहीच नाही सांगू शकत. मला माझा देव अमूर्त वाटतो! ज्याच्यासमोर झुकण्याची/ ज्याला खुश करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. असं केल्याने देव मला हवं ते, मी मागेल ते सगळं सगळं काही मला देईल आणि मला सुखी ठेवेल असही मला नाही वाटत. कारण आधी हिरेक्लिटस आणि नंतर बुद्ध मला हेच सांगत राहतात कि जगण्यातलं दुःख आणि आयुष्यातलं इमपरफेक्शन अटळ आहे. मग परफेक्शनच्या मागे जीव खाऊन पळण्यापेक्षा आणि स्वतः चा भ्रमनिरास करून घेण्यापेक्षा मी आहे तसं सगळं स्विकारणं जास्त रास्त आहे ही जाणीव मला तत्त्वज्ञान करून देतं.
        बघीतलस! हे असं सेल्फ-एक्सप्लोर करायला तत्त्वज्ञान मला मदत करतं. धर्माच्या, परंपरेच्या नैतिक संकल्पना झुगारून दिल्यावर माझ्या नैतिक संकल्पना उभारायला तत्त्वज्ञान मला आधार करत. त्या चुक की बरोबर हे तपासून घ्यायला मला तत्त्वज्ञान शिकवतं.
अस्तिक माणसा, तत्त्वज्ञान मला देव नाकारायला शिकवत नाही. बस माझी नास्तिता चूकीची नाही हे शिकवतं. सोबतच जे अस्तिक आहेत, जे देव मानतात त्यांच्या मताचा आदर करायला शिकवतं. तत्त्वज्ञान मला न्याय दर्शन किंवा वेद देवाच्या अस्तित्वाचे पुरावे देतं इतकच सांगतं. पण 'देवाच्या असण्याचे एखादी scientific गोष्ट प्रुव्ह करताना द्यावे लागतात तसे प्रुफ्स का द्यावे लागतात ... किती खोटेपणा आहे इथे, किती चुकिचय हे!' असा विचार करत असताना तत्त्वज्ञान मला 'ते' सुद्धा बरोबर असू शकतात ही द्रुष्टी देतं. तत्त्वज्ञान मला सहिष्णुता देतं.       तत्त्वज्ञान माझ्या सौदर्याचा कल्पना बदलतं.तत्त्वज्ञान मला 'know thyself' शिकवतं. तत्त्वज्ञान मला मी स्त्री नसून मुक्त माणूस आहे हे सांगतं. कुठलीही व्यक्ती स्री, पुरुष किंवा इतर कुठल्याही जेंडर पलिकडे एक निखळ माणूस असू शकते हे तत्त्वज्ञान माझ्या मनावर बिंबवतं. तत्त्वज्ञानात मला 'वसुधैव कुटुंबकम्।' चा खरा अर्थ उलगडतो. तत्त्वज्ञान मला माणूसपण देतं आणि माणूस बनवतं.
        प्रिय अस्तिक माणसा, इतक्या सुंदर जगण्यासोबत मानसिक समाधान आणि स्टेबिलिटी तत्त्वज्ञान मला देत असताना, मला सांग, तू हे सगळं नाकारून, दिसणा-या सूर्याकडे पाठ फिरवून मी पुन्हा अंधा-या गुहेत जाऊन बसावं असं तू का बरं म्हणतोस? मी 'कुठुनतरी' 'काहितरी' शिकून येते आणि वेड्यासारखं वागते असं तुला वाटतं. पण मला माहितीये, जे मनसोक्त नाचत असतात त्यांना तेच लोक वेडं म्हणतात ज्यांना ते ज्यावर नाचतायत ते संगीत ऐकू येत नसतं. सॉक्रेटिस असो वा गॅलिलिओ प्रत्येक नाचणा-या माणसाला जग वेडंच म्हणतं. तळ्यातल्या बदकांच्या पिल्यांपेक्षा 'वेगळं' असणारं पिल्लू नेहमी कुरुप आणि वेडच असतं.
        शेवटी इतकच सांगेन, तु काय किंवा मी काय आपण दोघेही जैनांच्या सहा आंधळ्यांच्या गोष्टितले हत्ती एक्सप्लोर करणारे दोन आंधळे आहोत. तू पाय चपापतोयस आणि मी सोंड! आपण दोघांनीही संपूर्ण हत्ती जाणला नाहीये. तो कळत नाही तो पर्यंत एकमेकांचा आदर करत राहूया?
                                                      तुझीच,
                                            एक नास्तिक मैत्रिण.
©Renuka

Saturday, 11 November 2017

ग्रहण

प्रिय,
     मी पृथ्वीसारखी होते. तू खोदत होतस माझे भूभाग खोल-खोल. उलगडत होतास माझ्या अंतरंगातली रंगीबेरंगी खनिजं.. तू माझ्या भूगर्भातील ज्वालामुखी सुद्धा पाहीलास. मला वाटायचं हा ज्वालामुखी शांत करण्याचं काम फक्त तूच करु शकतोस. नंतर उमगलं मी फक्त तूलाच ते करु देत होते. विनाशकारी आणि जिवनदायनी ही दोन्ही रुपं मी तुझ्यासमोर निर्लज्जपणे उघडी केली. इतकच काय! माझी हतबलता, माझ्यातला वांझोटा भाग, माझ्या अंतरंगात होणाऱ्या अस्वस्थतेने माझ्या शरीरावर उमटणारे भूकंप... तू सारं सोसलस. माझं तारांगण उघड्या डोळ्यांनी मनसोक्त पाहिलंस. समुद्रासारख्या माझ्या खारट अश्रुंवर तू कविता केल्यास. मी आजारी झाल्यावर झाडं लावावीत तशी तू माझी वेणी-फणी केलीस. तू माझं सौंदर्य इन्जोए केलसं, तशीच माझी विराटता सहन केलीस. पण तू माणूस होतास हे मी नजरअंदाज केलं; तिथेच माझं चुकलं.
    माझ्यावरच्या प्रेमाच्या बदल्यात तू माझ्यावर उमलणा-या कित्येक कळ्या निर्दयीपणे खुंटल्यास. माझ्या पोटातली खनिजं तू तूझ्या हितासाठी वापरलीस. माझ्या चेह-यावरून येणारा बुद्धिमत्तेचा सुर्यापेक्षाही प्रखर प्रकाश तू तूझ्या डोक्यातली खानावळ शिजवण्यासाठी वापरलास. माझ्या हतबलतेत, माझ्या लाचारीत तू मला स्वतःचा गुलाम समजलास. माझ्या शरीरावर उमटणारे भूकंप तू बुझवलेस माझं सात्वंन करतोयस असं दाखवण्यासाठी. 
     ....तरीही... मी तूझ्यावर प्रेम केलं. कारण, मी तुला त्रास दिला तरी इसवीसन पुर्वी पासून तु माझ्याजवळच होतास. माझा सोडून दुस-याचा विचार केला नाहीस. पण आज तू मंगळावर जाऊन आलास. तूला दुस-या ग्यालेक्सीत इन्टरेस्ट वाटू लागला. तूझ्या वी-यांपासून तयार झालेली असंख्य लेकरं असणारी पोटुशी 'मी'  कुरूप झाले होते. तूला  नवं सौंदर्य हवं होतं...
     तू मंगळावर पाणी शोधू लागलास. चंद्रावर हवा शोधू लागलास. माझ्या आयुष्याला ग्रहण लागलं...
                                                                 तूझीच.         
                         
©Renuka

आधुनिक काळ आणि हरतालिकेचं व्रत.

रेणुका कल्पना हिमालयाची कन्या पार्वती ही उपवर झाल्यावर तिच्या पित्याने तिच्यासाठी पती म्हणून विष्णूची निवड केली. विष्णूशी लग्न करा...